मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Saturday, December 20, 2008

॥ मोरपीस ॥


(गझल)

कुठं काय झालंय्‌ अजून ? पुष्कळ करायचं आहे
इथं कुणा लेकाच्याला, सत्तरीत मरायचं आहे ?

हौशी झाल्या, मौजी केल्या सगळ्या, म्हणून काय झालं ?
पुन्हा एकदा, विशीचं कातडं, पांघरायचं आहे

साहेबाची ऐशी-तैशी, करतां करतां राहून गेली
चाकरीतलं मिंधेपण, एकदां ठोंकरायचं आहे

तसे पांच-दहा हजार, पोष्टांत ठेंवून झालेत, पण
लाखाची नोट बघून, डोकं गरगरायचं आहे

पंचविशीत म्हटलं होतं, " साडी बरी नाही " म्हणून
साठी आली तरी, तेंच झेंगट, निस्तरायचं आहे !!

"झाली एक बस्स्‌ पुरे, डोईजड झाली", म्हणत
मधुबालाबरोंबर, काळीज हरायचं आहे !!

पुढचा जन्म कधी, कुठं, कसला ? कुणांस ठाऊक, पण
उंदिरमामा झालो तरी, हिलाच वरायचं आहे !!

ऊन्ह-पाऊस खाऊन खाऊन, मिश्यासुद्धां पिकल्या, तरी
आठवणींचं फुलपाखरूं, ओंजळीत धरायचं आहे !!

विटीदांडू, गारगोट्या, गलोरीच्या गदाड्यांत
हमरीतुमरीवर येत, खेंळांत उतरायचं आहे

’बाबा आपल्या घराण्यांत 'रविशंकर' कोण झाले' ?
पुढच्या छप्पन्न पिढ्यांनीं, नक्की विचारायचं आहे !!

नुस्ता ’झालो’ की ’जगलो’ ?, काळच ठरवील म्हणा !
वहीमधलं मोरपीस, अजून थंरथंरायचं आहे !!!

**************
----- रविशंकर.
१० ऑगस्ट २००२

No comments:

Post a Comment